दहावीतलं 'lockdown'

    खरं तर लोकहो..दहावी या विषयावर एक आद्य ग्रंथ लिहिता येऊ शकेल नाही का? म्हणजे आपलं मूल 10 वीत गेलं की कुणी कुणी कसं कसं वागावं, मुलांनी काय करावं..स्वत: आई वडिलांनी कसं वागावं..आजी आजोबांनी कसं वागावं..मित्र-मैत्रिणींनी कसं वागवं ते अगदी शेजा-यांनी सुद्धा कसं वागावं..
    अगदी 9 व्वी पर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं..अचानक 10 वी ला गेलं की काय माशी शिंकते देव जाणे..सर्वात मोठं पाऊल म्हणजे केबल बंद करणे..म्हणजे एवढी वर्ष टीव्ही बघूनही चांगली पास होणारी मुलं अचानक 10 वी च्या वर्षाला गेल्यावरंच काय ते टीव्ही पाहून नेमके नापास होतील अशी भोळसट (का बावळट म्हणतात ते) समजूत आई बाबांची असते..इथे बसतो पहिला घाव..
    मग येतो दुसरा.."ती खेळायला येणार नाहिये तिला अभ्यास आहे"..किंवा 'अहो काकू, जरा टीव्ही चा आवाज कमी करता का? माझा मुलगा अभ्यास करतोय"..असं शेजा-यांना सांगायचं..अहो अभ्यासासारखं काहितरी असतंच की आपल्याला 1 ली ते 9 वी..ते करतो आपण आणि पास होतो दर वर्षी..मग आत्ताच खेळण्याचा वेळ तेवढा कमी झाला की कसा काय अभ्यास होणार बरं..?
    आता तिसरा घाव..सगळ्या आवडत्या गोष्टींना brake...नृत्य, संगीत, क्रीडा इ गोष्टी ज्या एरवी अगदी आयुष्यातलं महत्वाचा घटक वगैरे असतात त्या अचानक या 10 वी नामक राक्षसाला तेवढ्या रुचत नाहीत कशा?
    आणि सर्वात मोठा घाव..अभ्यासाचा क्लास..(जिथे अर्थात काहीही अभ्यास होत नाही) वर्गात हजर असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेलं समजलंय की नाही हे तपासलंच जात नाही..आणि नुसत्या टेस्ट वर टेस्ट द्यायच्या आणि म्हणायचं बघा आम्ही किती तयारी करून घेतो..इतकी वर्ष आपला आपण अभ्यास करणारी मुलं अचानक या क्लास नामक दलदलीत ढकलली जातात ते खरं तर fashion म्हूणन..शास्त्र असतं ते..
    खरं सांगायचं तर ते 10 वी चं वर्ष कधीच आवडलं नाही मला..दगड धोंड्यांचाही उपयोग होतो पण इथे डोक्यात काहितरी कचरा भरला गेला..इतिहासात काय तर ज्या नेत्यांनी देशासाठी काहिही केलं नाही त्यांचे गोडवे कसे गायचे..भुगोलात काय तर कुठल्या नद्या कुठून वाहतात..त्याच्या उपनद्या..त्यांचे नकाशे..कुठली पिकं खरीप आणि रब्बी ..नागरिक शास्त्र ही तर अंधश्रद्धा..देश कसा चालतो या विषयाला सर्वात कमी महत्व..आणि त्या गणितात तर नुसते आयुष्यभराचे problems..गुंता स्वत: करायचा आणि तो विद्यार्थ्यांना सोडवायला द्यायचा..विज्ञानात तर काय respiratory system काढा..ती दळभद्री plant cell आणि animal cell काढा..अहो भूतदया दाखवा..झाडं लावा झाडं जगवा हे तेवढं शिकवायचं राहून गेलं नाही का..?
    एवढी वर्ष बरा अभ्यास केलेल्या आपल्या मुलांना आईवडील "अगं..अमुक ताई ला किंवा दादाला फोन लावते..तिला विचार अभ्यास कसा करू" हे सांगतात..ती रोज 4 पोळ्या खाते म्हणून मीही खायच्या असं म्हणण्यासारखं झालं की ओ हे..
     आणि...वर्ष सरतं..बोर्डाची परीक्षा येऊन एखाद्या घाट रस्त्यासारखी उभी ठाकते..काही अपवाद वगळता इतर खोटी काळजी दाखवणा-या बावळट नातेवाईकांच्या फोन चा वर्षाव.." all the best..tension नको घेऊ..पेपर पुन्हा तपासायचा" जणू काही मी नापास झाले तर माझ्या भवितव्याची संपूर्ण जबाबदारी हे घेणार..
     माझ्या बाबांनी प्रथेप्रमाणे 15 दिवसाची रजा काढलेली..आईचा हुकुमच होता तसा..'मला काहिही टेन्शन नकोय..तुम्ही रजा घ्या'. मला अजूनही आमच्या पहिल्या पेपर चा दिवस लख्ख आठवतो..आमचीच शाळा आम्हाला सेंटर आलेली..सगळे आई वडील मुलांना सोडायला आलेले..आम्ही जणू काही एका ऐतिहासिक युद्धावर चाललेले सैनिक आहोत अशा आविर्भावात सगळे वागत होते..ओवाळणं तेवढं बाकी ठेवलेलं..आमच्या शाळेबाजुला मोठालं मैदान होतं..आम्ही आमच्या वर्गात गेल्यानंतर corridor मधे उभे असता खाली पाहिलं..तर तिथे सगळे आई बाबा टाटा करायला उभे..मला त्या वेळी titanic चित्रपट आठवला..बोट सुटायच्या आधी सगळे जमलेले लोक खाली उभे राहून प्रवाशांना अच्छा करत असतात अगदी तसं वाटलं..बाबा मला दररोज सोडायला यायचे हे वेगळं सांगायला नको..एरवी सायकल ने सुखरूप जा ये करणारी आपली मुलं नेमकी त्या दळभद्र्या 10 वी च्या वर्षातच काय ती सायकल नीट चालवणार नाहीत ही भाबडी समजूत..माझ्या काही मित्र मैत्रिणींना तर त्यांच्या आई बाबांनी private रिक्षा लावलेली..त्यामुळे शोफर ड्रिवन कार मधे बसल्याच्या ऐटीत ही मुलं यायची..हे असले लाड रोज रोज कोण करणार नाही का..
     अजून एक गंभीर मुद्दा..परीक्षा सुरू असली की लौकर उठून अभ्यास करावा..हा नियम ज्या महाभागाने केला असेल त्याला मला भेटून विचारायचंय..काय रे बाबा..काय problem आहे आयुष्यात..? कसला सूड घेतोयस..?
     माझं म्हणाल तर मला मुळातच पहाटे वगैरे उठून अभ्यास करायला कधी जमला नाही..आवडलाही नाही..मग खास दहावी ची परीक्षा सुरू असतानाच का बरं करायचा? का तर म्हणे सकाळी वाचलेलं लक्षात राहतं..मुळात ऐन परीक्षा सुरु असताना आयत्यावेळी कितीही अभ्यास केल्याचा आव आणा त्याचा फारसा उपयोग नसतो..त्यातून गणित माझा हाड वैरी..भूमिती चा पेपर होता त्या दिवशी तर मी मस्तं 8 ला उठले..तिथे, मी अजून उठले कशी नाही म्हणून बाबांना टेन्शन..आईला म्हणतात कसे" बघ,गणिताचा पेपर..अजून झोपून राहिलिये." आई म्हणाली अहो झाला असेल अभ्यास तिचा..(शेवटी आईच जीवाभावाची) मी हे सगळं ऐकत होते..जरा वेळ मजा घेतली आणि नाइलजाने उठले..गणित विषयाला रामराम ठोकायचा असल्याने मी मात्र फार आनंदात होते..आणि नंतर येतात ते result नंतर चे दिवस..
     एकूण काय या दहावी नामक lockdown ची आपल्याला सवय असते..हे बंद ते बंद...हे थोडं सुरू..ते थोडं बंद सुरू..ते थोडं सुरू बंद..अशी अनेक बंधनं पार पाडत आखेर परीक्षा संपते..आणि सद्ध्या जसं unlockdown सुरू झालंय तसं घडू लागतं..नव्या नवरीने माप ओलांडावं तसं केबल connection घरात अलगद येतं..उशिरा उठण्यावरची निर्बंध शिथील होतात..आपल्याला या वर्षात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे आई बाबा त्यांचा पूर्व उद्घोष पुन्हा ठणाणतात "तुला काय वाटेल ते कर..मला कटकट नको करूस" पुन्हा सगळे जैसे थे..result लागल्यावर घरोघरी जाऊन पेढे वाटण्याचं कंटाळवाणं कामंही करायला लागतं..आणि त्या अभूतपूर्व प्रश्नाचा भडिमार होतो.."मग आता पुढे काय?" माझ्या मनात आलेलं असं म्हणावं.."तुम्हाला काय करायचंय..पेढे खा गप"..पण आपण सभ्य मुलं..अशी उत्तरं कशी देणार नाही का?
    पण हे कौतुक 10 वी तंच बरं का 12 वीत नाही. जसं लग्नानंतर पहिल्या बाळंतपणाचं कौतुक असतं ना अगदी तसं..दुसरं remains just a formality ..
     12वीत ना केबल बंद होतं..ना बाबा लोकं रजा काढतात..ना पेपरला जाताना रिक्षा लावली जाते..सगळं काही जैसे थे..
     तर असं हे दहावीचं lockdown..आत्तचेही lockdown हळू हळू unlock होईल आणि मग परिस्थिती पुन्हा जैसे थे!!!

Image courtesy: google
    
    
      

Comments

Popular posts from this blog

एका अंघोळीची गोष्ट

कल्हई

श्री स्वामी समर्थ..