डोळे

    काय विलक्षण अवयव मिळावा हा आपल्याला....केवळ जादू..बंद असताना सुद्धा स्वप्न दाखवतो आणि उघडे असताना सुद्धा..काहिही न बोलता आपल्याला व्यक्त होण्याची सूट देतो..प्रेम..राग...अशा परस्पर विरोधी भावना सुद्धा हा आपला जादुई अवयव समोरच्या पर्यंत अगदी सहजगत्या पोहोचवत असतो..दु:ख आणि आनंदाश्रु वाहून आपल्याला मन  मोकळं करता येतं ते डोळ्यांतूनच..मेंदू पासून अगदी जवळ असलेले डोळे जणू आपला दुसरा मेंदूच..बेशुद्ध अवस्थेतला रूग्ण डोळे कधी उघडतो याकडे जास्तं लक्ष दिलं जातं..डोळे उघडले म्हणजे हरपलेलं भान ठिकाणावर आलं म्हणतात..
    दिवसाचे अमुक एक तास आपल्या कोषात जाण्याची सोय सुद्धा आपल्या डोळ्यांनी केलिये बरं!..ध्यान करताना किंवा अगदी निद्रेत असताना सुद्धा डोळे मिटल्यावर आपण काही काळ 'एकांतात' जातो..आजुबाजुला कितीही कल्लोळ असो..स्वत:ला दुरुस्त करण्याची व पारखण्याची संधी या मिटलेल्या डोळ्यांमुळे रोज मिळत असते..जग जसं उघड्या डोळ्यांनी  पाहता येतं तसं बंद डोळ्यांनीही. त्याच्यावरचं मनन चिंतन हा त्यामागचा हेतू..
    अलिकडे मी डोळे तपासायला गेले. खूप वर्षात तपासले नव्हते. एकूणच डोळे तपासणीकडे आपण दुर्लक्ष करतंच असतो..मात्र सद्ध्या online पद्धतीने काम सुरु असल्यामुळे अचानक डोळे असल्याचा साक्षात्कार वगैरे झाला आणि ते तपासलेही पाहिजेत..आपलेच आहेत ते म्हणून appointment घेतली..routine check up झाल्यानंतर डोळ्यात drops घालून पुन्हा एकदा eye pressure इत्यादी तपासणी केली जाते. Drops घालून झाल्यावर ते डॉकटर पुन्हा बोलवे पर्यंत डोळे अजिबात उघडायचे नसतात..या दरम्यान 20 मिं तरी जावी लागतात..मला drops घातल्यानंतर मला तशी सूचना दिली गेली..
    काही वेळ मी शांत बसून होते..मग मात्र..चुळबूळ सुरु झाली..हळूच डोळे उघूडून किती वाजलेत बघ..अर्धवट डोळ्यांनी फोन बघ..कोण आलं कोण गेलं अशा नको त्या गोष्टीकडे लक्ष..असं अजून किती वेळ बसवून ठेवणार या विचाराने जरा वैतागलेच होते.
खरं तर किती साधी सोपी गोष्ट...काही वेळ डोळे मिटून शांत बसायचं होतं..एकदा तर तिथल्या receptionist ने, लहान मुलं ऐकत नाहीत तेव्हा जसं वाsss! करतात तसं मला 'डोळे उघडू नका' म्हणून मला दटावलं सुद्धा'...ज्याचं मला थोडं हसु आलं..🤭🤭🤭एकूणच हे सगळं घडे पर्यंत 12 वाजून गेलेले आणि पोटात काव काव ऐकू येऊ लागली..मनात आलं..डबा घेऊन आलो असतो तर मिटळेल्या डोळ्यांनी का होईना हळूच पर्स मधून काढून एक एक घास खाता आला असता..
  एकूणच भुकेची आणि संयमाची परीक्षा घेवून जेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं तेव्हा एखादा विश्वविक्रम केल्याच्या आनंदात मी cabin गाठलं..तपासणी होऊन निघताना डॉक्टरांनी 15 दिवसांनी परत ये असं म्हणताच..मनातल्या मनात कपाळावर हात मारला आणि या दिव्व्यातून पुन्हा जायची ताकद दे रे बाबा अशी प्रार्थना देवाकडे गेली..🤣🤣
   औषधाचा परिणाम पूर्ण संपलेला नव्हता..अजूनही मला सगळं स्वच्छ दिसत नव्हतं..बिलावरची रक्कमही..😅😅पण पैसे देणं भाग आहे..आणि तिथून वळताच एक सणसणीत चपराख बसल्यासारखी झाली..
   मी निघत असतानाच साधारण 15-16 वर्षांचा मुलगा तिथे आला..पूर्णपणे दृष्टीहीन..सोबत वडील असावेत..त्याच्याही डोळ्यात drops घालण्यात आले..आणि त्याला निश्चल बसलेला बघताच मी तिथून निघाले..बास..धडा मिळाला..आपण केलेल्या विश्वविक्रमाचा अभिमान कृष्णविवरात गेला..पुन्हा कधीही न येण्यासाठी..आपल्याला दिसतं म्हणून आपण कुणीही 'विषेश' नाही याची जाणीव झाली..तो मुलगा मात्र 'विशेष' होता आणि राहील..यालाही आपल्यासारखी स्वप्न बघता येवो आणि ती पूर्ण करण्याची शक्ती त्याच्या ठायी येवो ही मनोमन प्रार्थना केली..
   
   
    

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....