आगळी अभिव्यक्ती
आपल्या पैकी ब-याच घरांत आजी-आजोबा असतील...आजी-आजोबा म्हणजे वृद्ध..साधारण 80-85 किंवा त्याहून अधिक वय पार केलेले..पण तब्ब्येतीने तसे ठणठणीत..स्वत: स्वत:चं सगळं दिनमान पार पाडू शकणारे..
आमच्या घरात आजोबा, वय वर्ष 93 आणि आजी वय वर्ष 85-86(नात्याने माझे आजे-सासूसासरे) अशी ठणठणीत जोडी आहे..ठणठणीत शब्दावर अशासाठी जोर दिला की काही तब्ब्येतीच्या गंभीर तक्रारीच्या
आजींना एका कानाने अजिबात ऐकू येत नाही..मला तर कधीतरी वाटतं दोन्ही कानांनी असावं..कारण त्यांना काहीही सांगायचं झालं की काही वेळाने मला धाप लागते इतक्यांदा..आणि इतक्या जोराने सांगावं लागतं...कानाचं यंत्र न वापरण्याच्या यांच्या सारख्या बहुतांश आज्यांशी घरोघरी असाच संवाद होत असावा..😅😅पण आजोबांना मात्र मी एकच गोष्ट आजींना ऐकू न आल्यामुळे 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना ऐकलंय..😅😅इतक्यांदा सांगून जेव्हा आजीला कळतं तेव्हा आपण मात्र world cup जिंकल्याचा जितका आनंद क्रिकेट प्रेमिंना होत नसेल तेवढा आनंद आजोबांना होत असावा..कारण एवढ्यांदा सांगून सुद्धा जेव्हा आजीला काहिही ढिम्म ऐकू जात नाही तेव्हा आजोबा मनसोक्तपणे "गप्प बस तुला काही कळत नाही" असं म्हणतात..जेही अर्थात आजीला ऐकू गेलेलं नसतं..आजोबांच्या चेह-यावर मात्र catch सुटल्याचा वैताग दिसतो😄😄😄 हे ऐकल्यावर Sarabhai vs Sarabhai मधले मधू फुफा- इंद्रवदन आठवतात..😅😅
आजी-आजोबांना त्रांजिस्टर वरती गाणी ऐकायला आवडतात..हिंदी मराठीतली जुनी गाणी नेहमीच ऐकत असतात..यातलं आजींना किती ऐकू जातं प्रश्नच आहे..पण काही आवाज आला नाही की" संपली का ओ गाणी" असं मात्र आजोबांना विचारतात..तारुण्यात मात्र आजींनी अगदी आवडीने गाणी ऐकली असावी..कारण ओट्यापाशी असताना आजी भजन, अभंग, लावण्या इ. सगळं काही अगदी आनंदाने आपल्या घोग-या आवाजात गात असतात..मात्र या दोघांमधला सर्वात गमतिशीर वाटणारा संवाद कुठला असेल तर तो सकाळचा..आजी अगदी प्रेमाने आजोबांना विचारतात "का हो तुम्हाला परसाकडला झाली का? मला बाई साफ झाली..सकाळी परसाकडला साफ झाली की कसं छान वाटतं " या वयाला बहुदा जिव्हाळ्याचे इतर विषय संपून "परसाकडला साफ होणे" हा जगण्यातला महत्वाचा भाग ठरतो..बरोबरच आहे म्हणा..या वयाला शरीर धर्म व्यवस्थित असतील तर जिंकल्यासारखंच वाटत असावं..
यावरुन मला माझ्याही आजी अजोबांचा काहीसा असाच संवादही नेहमी आठवतो..माझी आजी हयात असे पर्यंत आजोबांना परसाकडला झाली का हा तिचा विशेष काळजीचा विषय असायचा..बरं याबाबतीत माझी आजी दहा पावलं पुढे..परसाकडला जायच्या ठरलेल्या वेळे व्यतिरिक्त आजोबांना जर का जावं लागलं तर तोही तिच्या चिंतेचा विषय असायचा.."काय ओ...आत्ता जाताय..काही होत नाहिये ना तुम्हाला?" हा तिचा ठरलेला प्रश्न..
वाढत्या वयानुसार बदलत जाणा-या नवरा-बायको या नात्याची मला नेहमी गंंमत वाटते..लग्न करून एकमेकांच्या आयुष्यात आलेली ही दोघं म्हातार वयात एकमेकांची मुलंच होतात बहुदा. तरूण वयात मातृत्व भावना व्यक्त करायला घरात लहान मुलं असतात..मुलं मोठी झाली की त्यांची लग्न होतात..त्यांच्या संसारात ते रमतात..मग आपल्या ठायी असलेलं मातृत्व व्यक्त करायला हक्कचं कोण..नवरा किंवा बायको..म्हणूनच हा आपला नवरा किंवा ही आपली बायको हे नातं शिथील होतं आणि मुलगा किंवा मुलगी हे नातं डोकवायला लागतं..याचा अर्थ तरूण वयात नव-याची किंवा बायकोची काळजी नसते असे नव्हे..मग वृद्ध वयात नेमकं काय बदलतं..बदलते ती अभिव्यक्तीची पद्धत..नाश्ता, जेवण, औषध, फिरायला जायच्या वेळा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परसाकडला होणे..
महत्वाचं काय आहे..अभिव्यक्त होणं..वय कितीही वाढलं तरी या नात्यातला गोडवा टिकून राहण्या करता त्या वयाला पेलेल अशा पद्धतीने मी काळजी करते किंवा मी काळजी करतो, माझं प्रेम अजूनही टिकून आहे, हे एकमेकांपर्यंत कायम पोहोचवण्यातच त्या नात्याची मजा आहे.
फोटो सौजन्य: फेसबुक
Comments
Post a Comment